वाई बाजार परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करामहावितरणच्या कार्यालयाला घेराव
प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील मोजे मदनापुर करळगाव यासह अनेक गावात महावितरण कार्यालयाकडून वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने अनेक वेळा निवेदन देऊनही वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने येथील नागरिक व शेतकऱ्यांनी वाईबाजार महावितरण कंपनीच्या कार्यालयाला दि.4 जुलै 2023 रोजी घेराव घालून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
माहूर तालुक्यात वाई बाजार येथे महावितरण चे उपकेंद्र असून येथून 35 ते 40 गावांना वीज पुरवठा होतो. तसेच शेतकऱ्यांनाही या कार्यालयामार्फतच विद्युत पुरवठ्याची सेवा देण्यात येते. गेल्या दीड महिन्यापासून येथे सतत विद्युत पुरवठा बंद राहणे, ट्रान्सफॉर्मर जळणे, खांब वाकणे, तार तुटून पडणे, अशा अनेक समस्यामुळे येथील शेतकरी आणि नागरिक त्रस्त होते.यासाठी अनेक वेळा गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी कार्यालयात जाऊन निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली होती. परंतु कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वेळेवर ही कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
यासाठी दि. 4 जुलै 2023 रोजी मदनापूर येथील शेतकरी बालाजी टनमने यांचे सह परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी वाई बाजार येथील महावितरणच्या कार्यालयाला तब्बल 4 तास घेराव घालून मागण्याचे निवेदन येथील सहाय्यक अभियंता यांना देऊन वीज पुरवठा व इतर कामे तात्काळ सुरू करून नागरिक आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी केली आहे यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.