उन्हाळा, प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ अशा समस्यांपासून बचावासाठी वृक्षारोपण फार महत्वाचे : सीईओ स्वाती खाडे
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झालाय आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात.निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्य जीवन जगणे सोपे झाले. तसेच या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे झाडे. झाडे आहेत मग आज आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. कारण या झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक असलेल्या प्राणवायू मिळतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते. वृक्ष आपल्याला जीवनावश्यक सर्व गोष्टी देतात.
या वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व व गरज पाहता मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव येथे वृक्ष दिवस साजरा केला. यावेळी शैक्षणिक संकुलाच्या सीईओ स्वाती खाडे यांनी, कडक उन्हाळा, प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ अशा समस्या दिवसेंदिवस उद्भवत आहेत. तसेच झाडांची कमी होत चाललेली संख्या यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच आपले ऋतुचक्र ही बदलत चालले आहे. त्यामुळे अशा समस्यांपासून आपल्याला आपला आणि सभोवतालच्या पर्यावरणाचा बचाव करायचा असेल तर “वृक्ष रोपण” करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मुलांना सांगितले.
यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील यांनी मुलांसोबत आशा सामाजिक प्रश्नांची चर्चा होणं गरजेचं आहे. तसेच त्यासाठीच्या उपाययोजना कळण्यासाठी शाळेच्या माध्यमातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यावेळी मुलांच्या हातून निसर्गोपयोगी झाडांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.