प्रतिष्ठा न्यूज

गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखणे या मागण्यांसह ‘गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना करा, या मागणीसाठी मुंबईत 3 मार्चला ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’!

प्रतिष्ठा न्यूज 
कोल्हापूर प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग !मात्र छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या या गड-दुर्गांची स्थिती आज दयनीय झाली आहे. त्यांच्याकडे आज लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. अनेक गड-दुर्गांवर अवैधपणे घरे, कबरी, दर्गे, मशिदी आणि अन्य बांधकामे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. छत्रपती शिवरायांचा वारसा जपायचा असेल, तर गड-दुर्गांवरील ही अतिक्रमणे तातडीने हटवायला हवीत. एकूणच गड-दुर्गांची संख्या, अतिक्रमणांची व्याप्ती, संवर्धनाची आवश्यकता हे सर्व पहाता गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखणे, यांसाठी स्वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळा’ची राज्य सरकारने स्थापना करावी, या मागण्यांसाठी मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने 1 मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या प्रसंगी श्री. किशोर घाटगे, श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. प्रमोद सावंत, श्री. मधुकर नाझरेे उपस्थित होते.

हा ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ शुक्रवार, दिनांक 3 मार्च यादिवशी दुपारी 12 वाजता ‘मेट्रो आयनॉक्स सिनेमा’ येथून आरंभ होऊन मोर्च्याचा शेवट ‘आझाद मैदान’ येथे होणार आहे. या मोर्च्यामध्ये राज्यभरातून विविध गड-दुर्गप्रेमी संघटना आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे 25 हून अधिक वंशज, यांसह विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार आहेत.

या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘नुकतेच किल्ले रायगड, किल्ले विशाळगड, किल्ले कुलाबा, किल्ले लोहगड, किल्ले वंदनगड आदींवर अतिक्रमणे झाल्याचे लक्षात आले आहे. ‘श्रीक्षेत्र मलंगगड’ यालाही ‘हाजी मलंग’ बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. ठाण्यातील ‘दुर्गाडी किल्ल्या’वर ईदला नमाजपठण होते, तेव्हा मंदिरात पूजेलाही बंदी केली जाते. विशाळगडावरील देवतांची मंदिरे, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांची समाधी जीर्णावस्थेत आहेत, तसेच अनेक ठिकाणी गडाची दुःस्थिती झालेली दिसून येते; मात्र गडावरील दर्ग्याचे सुशोभिकरण करत अतिक्रमण वाढतच आहे. हे वेळीच रोखले नाही, तर उद्या प्रत्येकच गड-दुर्गांची ही स्थिती होईल. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीभोवती मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने हटवून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असले फाजिल लाड चालणार नाहीत, हे दाखवून दिले आहे. त्याच पद्धतीने राज्यातील 35 महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अशी अतिक्रमणे हटवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे.’’

‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ला राज्यभरात बैठका, व्याख्याने, संपर्क दौरे, हस्तपत्रके, फ्लेक्स यांसह सोशल मिडीया यांद्वारे समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आम्ही समस्त शिवप्रेमी, गड-दुर्गप्रेमी, समस्त हिंदु समाज यांना मोठ्या संख्येने या महामोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करत आहोत. या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी 7020383264 या क्रमांकावर संपर्क करावा, असे ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने कळवण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.