स्पर्धेच्या युगात व्यवसाय वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आत्मसात करा : वसुंधरा बिरजे; सांगलीत मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्पर्धेच्या युगात व्यवसाय वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन एमआयडीसी कुपवाडच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे यांनी केले. शिवराज्याभिषेक सोहळा व मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचा वर्धापन दिन सांगली येथे मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक सभागृहात उत्साहात पेढे व साखर वाटून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
वसुंधरा बिरजे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी वापरून, नियोजनबद्ध आखणी करून सातशे वर्षे पारतंत्र्यात असलेल्या प्रदेशाला स्वातंत्र मिळवून स्वराज्य स्थापन केले. अशा प्रेरणास्थानी असणाऱ्या छत्रपतींच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नव्या, उद्योजकांनी कामात सातत्य ठेवून, नियोजनबद्ध आखणी करून आपला उद्योग- व्यवसाय करणे गरजेचे आहे. तरच सर्वसामान्य कुटुंबातील उद्योजक निर्माण होतील.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, अमृत तात्या सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेड महानगराध्यक्ष युवराज शिंदे, प्रणिती पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक आशा पाटील व आभार युवराज शिंदे यांनी मानले. जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा शितल मोरे, जिल्हा अध्यक्षा प्रणिता पवार, डॉ. संजय पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र खिल्लारे श्रीरंग पाटील , तेजदीपा सूर्यवंशी , रेखा पाटील, भारती पाटील, ललिता घाडगे बाळासाहेब पाटील, पंडितराव पाटील, ऋषिकेश गायकवाड, पवन कदम, तानाजीराजे जाधव, सुधाकर पाटील, रामराव सुळे, कीर्ती देशमुख,ऋतुजा शिंदे, अनुष्का पाटील व अनेक नव व्यावसायिक बंधू-भगिनी उपस्थित होत्या.