राजपूत्र आले आणि गेले… मनसेच्या पक्षबांधणीचा तासगाव दौरा तब्बल 5 मिनिटाचा
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : भाजप,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मनसेचा झेंडा घेऊन पक्ष वाढीसाठी लढणाऱ्या अमोल काळे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पक्ष बांधणीसाठी बाहेर पडलेल्या मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे अवघ्या पाच मिनिटात आवरून गेले. दुपारी साडेतीन चा कार्यक्रम तब्बल पाच तास उशिराने होऊन रात्री साडेआठ वाजता संपन्न झाला,तोही अवघ्या पाच मिनिटात.ना पक्षप्रवेश, ना युवकांशी संवाद,शेकडो युवक दुपारी साडेतीन पासून ठाकरे यांच्याशी सवांद साधण्यासाठी,त्यांचा सन्मान करण्यासाठी,ते कार्यकर्त्यांना काय संदेश देणार यासाठी वाट पाहत होते ते आले आणि पाचच मिनिटात न बोलता निघून गेले.प्रत्येक पक्ष बांधणीत युवकांचे योगदान हे मोलाचे असते,गेली दोन दिवस तासगाव शहर आणि परिसराला अमित ठाकरे येणार आणि काय बोलणार याची प्रतीक्षा होती,पण ते आले आणि स्वतःच्या पक्षा विषयी,पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मनसैनिकांना कोणताही उपदेश न देता पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले,त्यामुळे तासगाव तालुक्यात पक्ष वाढनार की संपनार हे येणाऱ्या काळात समजेल दिसून येईल.युवकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची तसदी सुद्धा त्यांनी घेतली नाही.
तालुक्यात शून्य अस्तित्व असलेल्या मनसे पक्षासाठी अमोल काळे सारखा युवक पक्षासाठी झटत असताना त्याच्या पाठीशी संपूर्ण ताकतीने उभे राहून त्याला पक्ष वाढीसाठी वेळ देणे गरजेचे असताना अवघ्या पाच मिनिटात येऊन जाणाऱ्या अमित ठाकरे यांनी येणाऱ्या काळात तालुक्यात पक्षवाढीची अपॆक्षा करणे चुकीचे ठरेल.